आळंदी वार्ता: मंगळवारी आणि बुधवारी संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने आळंदी शहर आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. देहूफाटा रस्ता, डुडुळगाव, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता आणि चाकण रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना संथ गतीने आणि सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागले. काही ठिकाणी रस्त्यावर माती वाहून आल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
शहरातील अनेक गटारांचे चेंबर्स तुंबल्याने अस्वच्छ पाणी रस्त्यावर वाहत असून, दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, रस्ते साफसफाई आणि गटार चेंबर्स उघडण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संध्याकाळी इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली. नदीच्या या अवस्थेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी नदी स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पावले उचलण्याची मागणी केली असून, पावसाळ्यापूर्वी गटारे आणि नदी स्वच्छतेची कामे पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली आहे. प्रशासन याबाबत काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.